मलठण (ता. शिरूर, जि. पुणे), प्रतिनिधी-श्री.सचिन शिंदे :
येथे वाढत्या थंडीचा फटका बसत असलेल्या ऊसतोड मजुरांना व परिसरातील गरीब नागरिकांना दिलासा देण्यासाठी उदय ज्योती फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने रविवारी चादरींचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत मलठण तसेच मलठणजवळील रावडेवाडी येथे पराग साखर कारखान्यावर कार्यरत ऊसतोड कामगार व मलठण परिसरातील गोरगरीब नागरिकांना मिळून एकूण ५०० चादरींचे वाटप करण्यात आले.

हा उपक्रम पुणे शहरातील नामांकित वकील व उदय ज्योती फाउंडेशनचे संस्थापक ॲड. उमेश दारवटकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. चादरींचे वाटप ॲड. उमेश दारवटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांचे कनिष्ठ सहकारी मलठण येथील ॲड. विशाल शिंदे, तसेच मलठण येथील त्यांचे सहकारी महाराष्ट्र कम्प्युटर एज्युकेशन चे संचालक श्री कैलास व लहुजी शक्ती सेना शिरूर तालुकाध्यक्ष श्री. प्रशांत साळवे, ॲड. उमेश दारवटकर यांचे सहकारी किसन कुंजीर उपस्थिती होते . या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून हा सामाजिक उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
यावेळी बोलताना संस्थेचे संस्थापक ॲड. उमेश दारवटकर यांनी सांगितले की, “उदय ज्योती फाउंडेशनच्या माध्यमातून १८ वर्षांखालील गोरगरीब विद्यार्थ्यांचे संपूर्ण शिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाते. तसेच गोरगरीब मुला-मुलींना कोणताही वैद्यकीय प्रश्न, हॉस्पिटल खर्च किंवा मोठे ऑपरेशन आवश्यक असल्यास ते संस्थेमार्फत विनामूल्य करून दिले जाते .
आपल्या गावात किंवा परिसरात अत्यंत गरीब, अंध, अपंग, गरजू विद्यार्थी किंवा वैद्यकीय मदतीची गरज असलेली मुले आढळल्यास त्यांनी उदय ज्योती फाउंडेशनशी नक्की संपर्क साधावा, असे आवाहनही ॲड. उमेश दारवटकर यांनी यावेळी केले.
चादरी मिळाल्याने ऊसतोड कामगार व गरजू नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, उदय ज्योती फाउंडेशनच्या या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.







